
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर याठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथे देखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे.
या घटनेनंतर, ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याने झाल्याचा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे. आमच्या लोकांवर असेच हल्ले होत राहिले तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.