
जावेद अख्तर हे दिग्गज गीतकार आहेत. अनेक वर्ष ते बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘लगान’, ‘बॉर्डर’, ‘ओम शांती ओम’ अशा बऱ्याच चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. सलीम खान आणि त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांनी मिळून लिहिलेले ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘शोले’ सारखे अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांच्या कविता देखील प्रसिद्ध आहेत. जावेद अख्तर जितके कवी आणि संवाद लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत तितकेच ते आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत ते विवाहबंधानात अडकले.
जावेद अख्तर यांची दूरदृष्टी अथवा कलाकाराची खरी ओळख कशी करावी हे या किस्स्यातून कळेल, जावेद अख्तर यांनी आमिर खानला बघताच क्षणी हा मुलगा ‘हिरो’ बनेल अशी भविष्यवाणी केली होती. जावेद अख्तर लगान चित्रपटातील कलाकारांच्या एका कार्य्रक्रमात सहभागी झाले होते. करण जोहर हा त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. प्रश्नोत्तरांच्या या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी आमिरबद्दलची एक आठवण सांगितली, ते म्हणाले की ‘नासिरजी (आमिरचे काका) यांचा खूप मोठा चाहता होतो त्यांच्यासोबत मी काम देखील केलं आहे, एकदा ते खंडाळ्यामध्ये हॉटेलात थांबले होते, मी देखील खंडाळ्यात होतो म्हणून त्यांना भेटण्यासाठी हॉटेलवर गेलो होतो’. ‘आमच्यात गप्पा रंगल्या होत्या तेव्हा मी पहिले, कोपऱ्यात एक मुलगा काहीतरी लिहत होता’, तेव्हा नासिरजी मला म्हणाले ‘अरे याला ओळखतॊस का? हा माझा पुतण्या आहे माझा सहाय्यक म्हणून काम करतो’, मी लगेच त्यांना म्हणालो ‘हे तुम्ही काय करत आहात? हा मुलगा पुढे जाऊन हिरो बनू शकतो, याला तुम्ही सहाय्यक म्हणून नका ठेवू’. हा किस्सा जावेद अख्तर यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या.