अमरावती : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची (वायसीएमओयू) विदर्भातील १५३ केंद्रे अडचणीत आली असून, युजीसीच्या निर्देशांमुळे त्या ठिकाणी यावर्षी प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विद्यापीठाने संबंधित केंद्र संयोजकांनाच मुक्त केले असून, त्या ठिकाणी शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित केंद्र संयोजकांनी संघर्ष समिती गठित केली असून, केंद्रे वाचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. सदर समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक तथा येथील प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास पवार यांच्यामते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून ते अमरावतीच्या खासदार, आमदार, माजी मंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. या सर्वांनी मिळून आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिकण्याचे स्वप्न पूर्णत्वास न्यावे. नोकरी, रोजगार किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे ज्यांचे शिक्षणाचे स्वप्न अर्धवट राहिले, त्यांना व ज्यांच्या गावात शिक्षणाची कवाडे अजूनही उपलब्ध झाली नाहीत, अशांना शिकता यावे म्हणून ठिकठिकाणी मुक्त विद्यापीठांची केंद्रे सुरू करण्यात आली.‘ज्ञानगंगा घरोघरी’ या ब्रीद वाक्यानुसार सदर केंद्रांनी त्यांच्यापर्यंत शिक्षणही पोहोचविले. परंतु आता मात्र एकाच झटक्यात ही सर्व केंद्रे बंद केली.