![](https://rrcdigital.com/site/wp-content/uploads/2022/09/image-246-1024x569.png)
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सगळं कसं जमून आलं? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. आधी सूरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा ते मुंबई असा या बंडखोर आमदारांचा प्रवास चर्चेत होता. मात्र, त्याहून जास्त चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकांची झाली. रात्री-अपरात्री या बैठका होत होत्या, असं खुद्द एकनाथ शिंदेंनी विधानसभेतल्या भाषणात सांगितलं होतं. फडणवीस वेश बदलून बैठकीसाठी येत असल्याचीही चर्चा रंगली. पण हे सगळं कसं घडलं? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच, फडणवीसांऐवजी आपल्याला मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? या प्रश्नावरही त्यांनी भूमिका मांडली आहे.
“मुख्यमंत्रीपदासाठी ‘कार्यक्रम’ केलाच नव्हता”
हा सगळा सत्ताबदलाचा कार्यक्रम आपण मुख्यमंत्रीपदासाठी केलाच नव्हता, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. “मित्रपक्षांच्या कारवायांमुळे शिवसेनेचे आमदार त्रस्त झाले होते. मतदारसंघात मित्रपक्षाकडून नारळ वाढविण्यात येत होते. यामुळेच आमदार बिथरले होते. पोलिसांच्या खोटय़ा केसेस, तडीपारी हे सारे सुरू झाले होते. एकाला तर काहीही कारण नसताना मोक्का लावण्यात आला. हे अतिच झाले होते. मी हे सारे तेव्हाच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर घातले होते. माझ्या खात्याच्या बाबतीत असेच घडत होते. पण मी त्यांना पुरून उरायचो. त्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यक्रम करून टाकायचो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.