अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम धामोरीचा रस्ता आज येथील रहिवाशांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक खड्डे या रस्त्यावर असल्याचे दिसते. त्या मुळे या ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्यावर वावरताना विद्यार्थी तसेच आजारी रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या भागातील विकासाची २३ वर्षाची प्रतीक्षा कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना केवळ विकासाचे चॉकलेट दिली जातात आज काही प्रमाणात शहरी भागाचा तरी कायापालट झाला. शहरे स्मार्ट होत चाललेली आहे. मात्र खेड्यातील परिस्थितीमध्ये अद्यापही फारसा फरक पडलेला नाही. बोटावर मोजण्याएवढी गावे सोडली तर ग्रामीण विभागाची अवस्था पूर्वी होती तशीच अद्यापही असल्याचे दिसून येते. मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या ग्राम धामोरीच्या मुख्य रस्त्यावरुन तथा तिथल्या ग्रामस्थांच्या व्यथांवरुन लक्षात येईल. तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची अवस्था अशीच आहे. रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी गेल्या १५ ते २० वर्षापासुन इथले ग्रामस्थ निवेदनं देऊन संघर्ष करताहेत. प्रशस्त आणि गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करणे हा आमचा अधिकार नाही का ? असा प्रश्न या भागातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून या यातनांमधून आमची सुटका करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.