ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी १० ते ११ ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोट (मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी)नुसार अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. प्रिंटिंग प्रेसमध्ये फसगत केली व विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.
प्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार होते. मुलगा प्रतुल व वडील असे दोघे जण राहत होते. घटनेच्या दिवशी प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता त्याच रात्री त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. ११ ऑगस्टला सकाळी शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिलने वडिलांना चहा नाश्त्यासाठी फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने येऊन पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत वडील दिसून आले. त्यानंतर अकोट फैल पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान प्रभाकर विरघट यांच्या खिशात तीन चिठ्ठ्या दिसून आल्या. त्यामध्ये शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस व्यवहार १९८८ मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, कॉ. रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजिया, मोतीलालजी कनोजिया यांनी फसगत केली, विश्वासघात केला, आर्थिक अडचणीत ठेवले, गुन्हेगार केले म्हणून आत्महत्या करत आहे, असे नमूद आहे. मुलगा प्रतुलने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोटमध्ये लिहले की मुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय द्यावा : प्रभाकर विरघट यांच्या खिशात तीन सुसाईड नोट पोलिसांना मिळाल्या. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदे सरकार यांनी मला मरणोपरांत न्याय द्यावा, असे म्हटले आहे. वरील सर्व आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करत आहे. सर्वांवर कारवाई व्हावी. प्रेस कामगार सुशीर वरघट रा. ख्रिश्चन कॉलनी याच्याकडून माहिती घ्यावी की प्रेसमध्ये बसणारे आंबेडकरी चळवळीतील कोण कोण होते. तिसऱ्या चिठ्ठीवर लिहले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करून सर्व आर्थिक जमानतदारांवर कारवाई करावी. या सर्वांनी सहकार्य केले नाही. मात्र गुन्हेगार केले हा अन्याय झाला म्हणून न्याय द्यावा, असेही नमूद केले आहे.