शिवसेनेनंतर आता मिशन राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापुरात 30-35 जणांचे सामूहिक राजीनामे, पक्षाला मोठे खिंडार

Maharashtra State

सोलापूर, 20 ऑगस्ट : राज्यात शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पडल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात एक वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 ते 35 जणांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 ते 35 जणांनी सामूहिक राजीनामे दिल्याने याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. तसेच हे सर्व जण उद्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सोलापुरातून पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे.दरम्यान, राष्ट्रवादी सोडल्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक रिक्षाचालक आहे. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतात. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मलिदा खाण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरचा मिळाला. त्यांचे नाव मामा असल्यामुळे अनेक भाचे मलिदा खाण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करतात, असा आरोपही शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावला. दरम्यान, मागच्याच महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा देत कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. सावंत यांनी मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *