“कॉफी विथ करणमध्ये मी या सेलिब्रिटींना बोलवण्याचं धाडस करणार नाही कारण…” करण जोहर स्पष्टच बोलला

Entertainment

दिग्दर्शक निर्माता करण जोहर हा सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसाठी चित्रपट काढणे आणि इतर कलाकारांना बाजूला ठेवणे असे कित्येक आरोप करून करणला सतत ट्रोल केलं जातं. या सगळ्यापेक्षा करणची सर्वात जास्त चर्चा होते ती त्याच्या टॉक शोमुळे. तो लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कॉफी विथ करण’. पहिले हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित व्हायचा पण आता याचा नवीन सीझन हा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.

या कार्यक्रमात करण बॉलिवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतो. सध्याच्या या नवीन सीझनमध्ये आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा अशा स्टार्सनी हजेरी लावली. आजवर या कार्यक्रमात बहुतेककरून सगळेच सेलिब्रिटी एकदातरी आले आहेतच. अमिताभ बच्चन, खान मंडळींपासून ते सध्याच्या नवीन पिढीच्या सुपरस्टार्सपर्यंत सगळ्यांनीच या कार्यक्रमात भाग घेतला आहे. पण नुकतंच करण जोहरने याबाबतीत एक खुलासा केला आहे. करणच्या मते या कार्यक्रमात २ सेलिब्रिटीजना बोलवायचं धाडस तो कधीच करू शकत नाही.
करणच्या मते तो बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि दिग्दर्शक निर्माता आदित्य चोप्रा यांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचं धाडस कधीच करू शकत नाही. याविषयी करणने खुलासा केला आहे, तो म्हणतो ” रेखाजी यांना मी एकदा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण रेखा ह्या स्वतः त्यासाठी उत्सुक नसल्याने मी त्यांच्या जास्त मागे लागलो नाही. शिवाय त्यांच्या बाबतीत आधीच एवढ्या स्फोटक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा मान राखून मी कधीच त्यांना बोलावणं धाडलं नाही.”

आदित्य चोप्राबद्दल बोलताना करण म्हणतो, “रेखाजी यांना आमंत्रण पाठवायचं धाडस तरी केलं, पण आदित्य चोप्रा यांना मी ते आमंत्रण पाठवायचंही धाडस करू शकत नाही.” करण जोहर आदित्य चोप्राला गुरु मानतो, आणि एकंदरच आदित्य चोप्रा यांचा स्वभाव हा अशा कार्यक्रमांसाठी योग्य नसल्याने करणने आजवर त्याला बोलावणं धाडलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *