अभिनेता किच्चा सुदीपच्या अभिनय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण, भारतीय टपाल विभाग करणार ‘विशेष’ सन्मान

Entertainment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप याचा आज वाढदिवस आहे. आनंदाची बाब म्हणजे, त्याने त्याच्या अभिनयातील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण केली आहेत. आजचा हा दिवस त्याच्यासाठी खास ठरला आहे. याचं कारण म्हणजे त्यानिमित्ताने भारतीय टपाल विभाग त्याच्या नावे एक लिफाफा आणणार आहे. यासाठी लवकरच एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.अनेक वर्षांपासून भारत सरकारचे टपाल विभाग महत्त्वपूर्ण प्रसंग, सन्मान आणि वैयक्तिक कामगिरीच्या स्मरणार्थ विशेष पोस्टल लिफाफे तयार करत आहे. यावेळी, भारतीय टपाल विभाग किच्चा सुदीपच्या चित्रपटसृष्टीतल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे स्मरण करत त्याचा सन्मान करणार आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण करण्यासाठी टपाल विभागाचा प्रतिनिधी नुकताच सुदीपच्या घरी गेला होता. त्याने भेटीदारम्यान किच्चा सुदीपला या सोहळ्याचे आमंत्रण केले. या अनोख्या लिफाफ्याचे लवकरच प्रकाशन होणार आहे. ही बातमी कळल्यावर किच्चा सुदीपच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर टपाल खात्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे किच्चा सुदीपलाही या सन्मानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.किच्चा सुदीप याचा जन्म कर्नाटकमधील शिमोगा येथे झाला. त्याने १९९७ मध्ये कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रातल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक कन्नड चित्रपटात काम केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूंक’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.त्यानंतर अनेक बॉलिवूड तसेच दक्षिणात्य चित्रपटात खालनायकाची भूमिका सकारात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आज तो मोठ्या पडद्यावरचा एक लोकप्रिय खालनायक बनला आहे. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *