
मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयाला देत टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या सी समरी अहवालावर आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. टॉप्स समूह गैरव्यवहराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महागनर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना ईडी चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सरनाईक यांची ईडी चौकशी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरनाईकांविरोधात गेली काही महिने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. ‘मला यावर काही बोलायचं नाही’, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजेच शिंदे गटात गेल्यावर सरनाईक यांच्या पाठीमागचे ईडीचा शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे आहेत तसेच सोमय्यांच्या आरोपांच्या फैरी थांबल्या आहेत.त्यामुळे कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सरनाईक यांची सुटका होणार आहे.