
सोलापूर : महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार व्हावे लागले. उद्या (गुरूवारी) सरकारला बहुमत सिध्द करावे लागणार होते, पण सध्याचे संख्याबळ पाहता सरकार निश्चितपणे तोंडावर पडणार हे निश्चित होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री तर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री एकनाथ शिंदे असतील, असे ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ‘ईडी’च्या माध्यमातून भाजपने सरकार पाडण्याचा डाव यशस्वी केल्याची चर्चा आता सोशल मिडियात सुरु आहे.महाविकास आघाडीतील कृषी, नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी असे पाच कॅबिनेट मंत्री बंडखोरांच्या गोट्यात आहेत. तर बंडखोरी केलेल्यांमध्ये चार राज्यमंत्रीदेखील आहेत. पण, राज्यात सत्तापालट झाल्यास शिवसेनेतील विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांची खांदेपालट होऊन त्यांना चांगला निधी मिळेल, अशी खाती दिली जाण्याची शक्यता आहे. तर बंडखोरी केलेल्या शिवसेनेसह अपक्षातील ५० आमदारांपैकी (मंत्री सोडून) किमान २० जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) हाती दिल्या जातील. जेणेकरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांच्या तुलनेत आमचा मुख्यमंत्री असतानाही तेवढा निधी दिला नाही ही खंत दूर होईल. भाजपकडून काही नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. राज्याचा कारभार सांभाळताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सत्ता काळात गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवले होते. आता पण ते खाते स्वत:कडेच ठेवतील. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि काही दिवसांत बहुमत सिध्द करून भाजप बंडखोर आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी अनेकांची ‘ईडी’च्या माध्यमातून चौकशी होणार आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळले, असे बोलले जात आहे.