
चेन्नई : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत बलाढय़ भारतीय संघाला पदक जिंकण्याची नामी संधी आहे, असे मत पाच वेळा विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले आहे. २०१३मध्ये चेन्नईतच विश्वनाथन आंनदला नमवून कार्लसनने प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले होते. चेन्नईत पुन्हा परतल्याचा अतिशय आनंद होतो आहे. चेन्नईतील त्या आठवणी अजूनही ताज्या असल्याचे कार्लसनने सांगितले.
रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत भारताच्या पहिल्या संघाला दुसरे मानांकन देण्यात आले आहे, तर अमेरिका अग्रस्थानी आहे. भारताच्या दुसऱ्या संघाला ११वे मानांकन मिळाले आहे.बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी नोंदणी झालेल्या १८७ संघांपैकी नॉर्वेकडून खेळणाऱ्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील कार्लसन या स्पर्धेबाबत म्हणाला, ‘‘भारताच्या दोन अव्वल संघांकडून पदकाच्या अपेक्षा करता येतील. भारताच्या दुसऱ्या संघात युवा खेळाडूंचा विशेष भरणा आहे.’’