
बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असंही त्यांनी सुनावलं आहे.
“संजय राऊतांचं शरीर, मन आणि बुद्धी कुचकं आहे. ते कधी जनतेसमोर गेलेच नाहीत. तेच आदित्य ठाकरेंना काय बोलायचं शिकवत असतात. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनीही तशा पद्धतीने बोलणं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा अपमान आहे,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.