नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर आता त्यांच्या समर्थक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. जम्मू-काश्मीरमधील ६४ नेत्यांनी एकाचवेळी मंगळवारी राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचा (Congress) राजीनामा देणाऱ्या ६४ नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहर लाल शर्मा यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व नेते येत्या रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखाली नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत.काँग्रेसच्या ज्या ६४ नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यात माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, घारू चौधरी, मनोहर लाल शर्मा, माजी आमदार बलवान सिंह, जम्मू काश्मीर काँग्रेसचे सचिव नरिंदर शर्मा आणि महासचिव गौरव मगोत्रा आदी नेत्यांचा समावेश आहे.अन्य पक्षांचे नेतेही आझाद यांच्यासोबत…
गुलाम नबी आझाद यांच्या उपस्थितीत अन्य नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद म्हणाले की, आझाद नवा पक्ष स्थापन करणार आहेत, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. काँग्रेसच्या नेतृत्वाने एकदाही आमची भेट घेतली नाही.
आम्ही आमच्या तक्रारी त्यांना सांगणार होतो. मात्र, कुणालाही आमच्या तक्रारी ऐकायच्या नव्हत्या. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही आम्ही संपर्क केला आहे. ते सुद्धा आझाद यांच्या पक्षात प्रवेश करतील. इतकेच काय तर सत्ताधारी भाजपचे नेतेही आमच्या सोबत येण्यास तयार आहेत.