“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

Maharashtra State

शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे.

ही केवळ तीन तासांची सभा आहे, यासाठी खूप मोठी लढाई जिंकलो म्हणणं योग्य नाही. दसरा मेळाव्यात कुणाकडे जास्त लोकं येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळवून शिवसेनेनं पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे, याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, याला लढाई म्हणण्यासारखं काय आहे? यामध्ये त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांची सभा शिवाजी पार्कवर झाली पाहिजे, असं न्यायालयाने म्हटलं असेल तर सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. आम्हीही मान्य केलंय. आम्ही आमची बीकेसीमध्ये तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फार मोठी लढाई जिंकलो, असं म्हणण्याची काही गरज नाही. ही केवळ तीन तासांची सभा आहे. दसरा मेळाव्यासाठी कुणाकडे जास्त लोकं येतात, यावर सगळ्यांचं लक्ष आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *