
मुंबई : राज्यात यंदा मॉन्सूननं दमदार हजेरी लावली असून सर्वदूर चांगला पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठ्या नुकसानीलाही समोरं जावं लागलं आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसात सुमारे १०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जुलैपासून आत्तापर्यंत पावसामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पंधरा दिवसात १०२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकज जण बेपत्ता आहेत. यामध्ये १८१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
राज्यात २७ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. या जिल्ह्यांतील २५० हून अधिक गावांमध्ये नद्यांचं पाणी घुसलं आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १४०० घरांचं नुकसान झालंय. त्यामुळं ४४ घरं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, तसेच मुसळधार पावसामुळे १८१ जनावरे दगावली आहेत. सध्या जवळपास आठ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. राज्यात सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून सुमारे दोन हजार नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलंय. राज्यात ठिकठिकाणी जवळपास ५२ मदत कँप उभारण्यात आले आहेत.